Logo Omkar Mission Dombivali

Uncategorized

now browsing by category

 

शक्तीकुंड

Blog placeholder

मनुष्याचे शरीर हे एक शक्तीकुंड आहे. ह्या कुंडामध्ये शक्ती वा ऊर्जा वास्तव्य करते. आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होणारी संपूर्ण ऊर्जा ह्या कुंडा मधूनच प्रवाहित होत असते. आपल्या शरीरा मध्ये असणारी शक्ती ही या कुंडामध्ये वास्तव्य करते म्हणून तिला ‘कुंडलीनी शक्ती’ म्हणतात. जर मनुष्य अंतर्मुख होऊन आपल्या शरीरातच त्या शक्तीचा शोध घ्यायला लागला तर खूपच लवकर तो शक्तीच्या त्या केंद्रापर्यंत पोहचेल जेथून ऊर्जा, शक्ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत असते.

आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आहे, शक्ती आहे याबद्दल काहीच शंका नाही. ऊर्जा आहे म्हणून आपण खातो, पितो, उठतो, बसतो, चालतो. ऊर्जा आहे, शक्ती आहे, परंतु कुठून प्रवाहित होते ही ऊर्जा? कोठे आहे तिचे केंद्र? आधुनिक विज्ञान म्हणत आहे की ऊर्जा ही नेहमी केंद्राभिमुख असते. ह्याचा अर्थ केंद्र कुठे तरी आहे. जेथून ऊर्जा, शक्ती समस्त शरीरा मध्ये प्रवाहित होते. त्या केंद्राचा शोध लागला तर शक्तिमान होणं कठीण नाही.

आपल्याला रोज साधारण वा असाधारण कामासाठी जी ऊर्जा लागते ती त्या केंद्रामधून आपल्याला मिळत असते आणि रोज प्रत्येक क्षणी तिचा वापर करून सुद्धा तो कुंड आज पर्यंत कधी रिकामा झालेला नाही. या संदर्भात ज्यांनी संशोधन केलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी आपल्या कर्तुत्वाने संपूर्ण विश्वाला आश्चर्यचकित करून टाकलं त्या असाधारणातल्या असाधारण व्यक्तींनी सुद्धा आतापर्यंत त्या कुंडामधून जास्तीत जास्त १५% शक्तीचा, ऊर्जेचा वापर केला आहे. सर्वसामान्य मनुष्य त्याच्या मध्ये असणार्‍या ऊर्जेपैकी फक्त २% ते ३% ऊर्जेचा वापर करत असतो. त्याची ९७% ऊर्जा त्या कुंडामध्ये निद्रिस्त सुप्त पडलेली असते. येथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या शरीरातील कुंडामध्ये असलेली ९७% ऊर्जा ही निद्रिस्त आहे सुप्त आहे पण मृत नाही. आपण प्रयत्न केल्यास ती जागृत होऊ शकते. कुंडामध्ये सुप्त असलेल्या निद्रिस्त असलेल्या जर जागृत करायचं असेल तर तिला आव्हान करा, तिला उत्तेजित करा, तिला जागृत करा.

कोण करु शकतो तिला आव्हान? कोण करू शकतो तिला जागृत? तोच जो स्वतः जागा झाला आहे. स्वतः झोपलेला माणूस इतरांना जागे करू शकत नाही. एक पेटलेला दिवाच दुसरा दिवा पेटवू शकतो. तथाकथित बुवा, बाबा, महाराज स्वतः एवढे झोपेत आहेत की स्वतःचे डोळे उघडू शकत नाही, बंद डोळ्यांनीच लोकांना ओरडून सांगत आहेत की, ऊठा, ऊठा, आता जागे होण्याची वेळ आली आहे. इथे लोकांना जागे करणारेच स्वतः झोपलेले आहेत. त्यांना स्वतःला आत्मसाक्षात्कार झालेला नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हेच त्यांना माहित नाही. त्यांची अशी तऱ्हा असल्यामुळे आज कुणाला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो यांवर आपण कसा विश्वास ठेवणार? म्हणूनच ते आपल्याला तुमची लायकी नाही, तुमची योग्यता नाही, तुमची पात्रता नाही, तुम्ही पापी आहात अस लोकांना सांगत सुटले आहोत.

योग्यता

आपणास आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. आपली कुंडलीनी शक्ती जागृत होऊ शकते. आपण म्हणाल हे कसं शक्य आहे? आम्हाला तर सांगितले गेले आहे कि, आम्ही पापी आहोत, चोर आहोत, खोटारडे आहोत, आमच्या पापाचा तर हिशोबच नाही. आम्ही आत्मसाक्षात्काराला लायक नाही.

आपण आत्मसाक्षात्काराला लायक आहात की नाही हे मला माहित नाही. परंतु आपण त्या ईश्वराचे अंश असल्यामुळे, आपणा सर्वांना अर्थात संपूर्ण मानवजातीला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार हा हक्क कुणीही आपल्या पासून हिरावून घेऊ शकत नाही. प्रश्न आपला आहे? आपणास तो पाहिजे आहे का? महायोग विज्ञानाची प्रयोग शाळा असणाऱ्या ओंकार मिशनच्या, ओंकार मेडिटेशन सेंटर मध्ये आपणास आपला हक्क प्राप्त होवू शकतो.

आपण हिंदू, मुसलमान, जैन, बौद्ध, शीख, पारशी, यहुदी, ज्यू यापैकी कोणीही असाल, आपण कुठल्याही धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे, जातीचे, पक्षाचे असाल, आपले सर्वांचे स्वागत आहे. कारण आपण सर्वजण त्या ईश्वराचे अंश आहात आणि ईश्वर हे वैश्विक सत्य आहे. त्या सत्याला प्राप्त करण्याचा, ते सत्य जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे. ईश्वर हा कुठल्याही धर्म, पंथ वा संप्रदायाची जहागिरी नाही. ज्या प्रमाणे सूर्याचा प्रकाश सर्वांसाठी आहे, वारा सर्वांसाठी आहे, पाऊस सर्वांसाठी आहे त्या प्रमाणे ईश्वरीय ज्ञान व ईश्वरीय अनुभूती ही सर्वांसाठी आहे व ती सर्वांना प्राप्त होवू शकते.

महायोग विज्ञान

Blog placeholder

महायोग हे विज्ञान आहे. महायोग हे विज्ञान आहे हे सत्य मान्य केल्यावर विज्ञानामध्ये असलेली प्रत्यक्ष कृती (Practical) व शाब्दिक ज्ञान (Theoretical) हे भाग महायोगा मध्ये सुद्धा अंतर्भूत करावे लागतात. महायोग विज्ञाना मधील ‘तत्वमसी’ हे महावाक्य म्हणजे ‘ते ब्रम्ह तूच आहेस’ हे शाब्दिक ज्ञान आहे. मी ब्रम्ह आहे. मी ब्रम्ह आहे, सोऽहं, सोऽहं असा कुणी कितीही उदघोष केला तरी जोपर्यंत त्या ब्रम्हाची प्रत्यक्ष अनुभूती देणारा समर्थ सदगुरू भेटत नाही तोपर्यंत त्या शाब्दिक ज्ञानाला काहीही महत्व नाही. उदाहरणार्थ रसायनशास्त्राचा एक प्रयोग आहे H2+O=H2O. प्रयोगशाळेत योग्य अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग न करता आपण H2O चा कितीही जप केला तरी H2O काही तयार होणार नाही.

महायोग विज्ञानाच सुद्धा असच आहे. तुम्ही कितीही ‘मी ब्रम्ह आहे’, ‘मी ब्रम्ह आहे’ असा जप करा पण जोपर्यंत तुम्ही योग्य सदगुरूच्या सानिध्यात महायोग विज्ञानाचे प्रयोग करत नाही तोपर्यंत तुम्हांला ‘अहं ब्रम्हास्मि’ ची अनुभूती कधीही येणार नाही. सदगुरू हे शक्तीसंपन्न असतात. महायोग विज्ञान त्यांनी पूर्ण आत्मसात केलेले असल्यामुळे ते काही मिनिटातच सुप्त असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून देऊ शकतात. त्यासाठी देश, काळ, वय, जात, धर्म, पंथ व संप्रदाय या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते. महायोग हे विज्ञान असल्यामुळे त्याची अनुभूती घेण्यासाठी कुणालाही, कसल्याही प्रकारचे बंधन नाही. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश सर्वांसाठी आहे त्याचप्रमाणे ईश्वरीय ज्ञान व ईश्वरीय अनुभूती सर्वांसाठी आहे व ती सर्वांना येऊ शकते. महायोग हे विज्ञान आहे हे सत्य मान्य केल्या नंतर शास्त्र हे बोलण्यासाठी अथवा दुसऱ्यांना सांगण्यासाठी नसून ते प्रायोगिक असतात हे दुसरे सत्य सुद्धा आपल्याला मान्य करावे लागेल.

आपल्याला ज्ञात असलेल्या प्रकाश लहरी मधला केवळ एक छोटासा भाग रंगरूपाने आपल्याला दिसत असतो. यथार्थ ज्ञान हे मनबुद्धीच्या अतीत आहे. मन बुद्धीच्या पलीकडे जाण्यासाठी जे साधन आहे ते अतींद्रिय स्वरूपाचे आहे. ह्या अतींद्रिय स्वरूपाचे विश्लेषण करणारे जे विज्ञान आहे त्या विज्ञानालाच महायोग विज्ञान म्हणतात.

महायोग हे विज्ञान आहे, महायोग विज्ञान सिद्ध करण्याची सुद्धा एक प्रायोगिक पद्धत आहे. अर्थात इतर सर्व विज्ञान शास्त्राप्रमाणे त्याची प्रायोगिक पद्धती थोडी वेगळी आहे. पदार्थ विज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान शास्त्र, मानसशास्त्र, खगोलशास्त्र या सर्व विज्ञान शास्त्रांच्या प्रायोगिक पद्धती एकसारख्या नाहीत. पदार्थ विज्ञान शास्त्राची प्रयोगपद्धती मनोविज्ञानाच्या प्रयोग पद्धतीहून वेगळी आहे आणि असायलाच पाहिजे. कारण ज्या विज्ञानाचे जे क्षेत्र आहे त्या विज्ञानाने त्या आपल्या विशिष्ठ क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रानुसारच्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने प्रयोग करून आपले सिद्धांत मांडावयास हवेत.

पदार्थशास्त्र, रसायनशास्त्र विज्ञानाचे भौतिक जगत हे क्षेत्र आहे आणि तद्नुरूप त्यांच्या प्रायोगिक पद्धतीही भौतिक आणि इंद्रियजन्य आहेत. महायोग विज्ञानाचे क्षेत्र मनोजगत आहे आणि तद्नुरूप त्याच्या प्रायोगिक पद्धती सुद्धा मानसिक आणि इंद्रियातीत आहेत. विज्ञानाप्रमाणे महायोग विज्ञाना मध्येही आपल्याला कित्येक अध्यात्मिक क्रिया वा घटना प्रत्यक्ष प्रायोगिक पद्धतीने कराव्या लागतील व त्यांचे अनुभव घ्यावे लागतील. महायोग विज्ञानाचा अर्थात भक्ती विज्ञानाचा अनुभव न घेता विश्वास ठेवला तर आपली अवनती झाल्याशिवाय राहणार नाही.

– प्रस्तुत लेख गुरुराज ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.

महायोग

Blog placeholder

हे जग लेच्यापेच्या लोकांचे नाही. गीता सांगते जीवन संघर्षमय आहे. तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला जर जगायचं असेल, स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. कृष्ण अर्जुनाला सांगतो, अर्जुना तुला हा दुबळेपणा शोभत नाही तू पुरुष आहेस.  ऊठ आणि पुरुषार्थ कर. महायोग विज्ञानाचा मार्ग हा पुरुषार्थाचा मार्ग आहे. देव, दैव, नशीब यांच्या नावाने खडे फोडत बसण्यापेक्षा स्वतःमधील अंतर शक्ती जागृत करा. महायोग विज्ञानाचे प्रयोग करून स्वतःला एवढा शक्तीमान बनवा की स्वतः ईश्वराने येऊन तुम्हाला विचारल पाहिजे की बेटा तुला काय पाहिजे.

या जगामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता, प्राप्त करून घेऊ शकता. तुम्हाला अशक्य काही नाही Everything Is Possible. सर्व काही शक्य आहे. फक्त तुम्हाला जे पाहिजे त्याच्या लायक तुम्ही स्वतःला बनवलं पाहिजे. तुमच्यामध्ये सुप्त असणारी शक्ती, सुप्त असणारे ज्ञान व सुप्त असणारा आत्मविश्वास तुम्ही जागृत केला पाहिजे. आपल्यामध्ये असणारे सुप्त ज्ञान, सुप्त शक्ती व आत्मविश्वास जागृत करण्यासाठी महायोग विज्ञान जाणून घेण आवश्यक आहे.

महायोग म्हणजे सर्व योगा मधील श्रेष्ठ असा योग. या पृथ्वीवर या योगापेक्षा दुसरा श्रेष्ठ योग नाही. कारण या एकाच योगात इतर सर्व योगांचा व उपासनांचा समावेश झाला आहे. एवढेच नव्हे तर इतर कोणत्याही साधनात कुंडलिनी शक्ती जागृत होऊन अनुभव येण्यास वेळ जातो. महायोगामुळे मात्र कुंडलीनी शक्ती जागृतीचे फळ तात्काळ मिळून नाना प्रकारचे दिव्य अनुभव साधकाला येऊन ब्रम्हप्राप्ती अगदी सहज होते.

या महायोगाचा महिमा अत्यंत अदभूत आहे. इतर अनेक योग योगी लोकांनी सांगीतले आहेत. मात्र महायोग हा स्वतः भगवान आदिनाथांनी सांगितला आहे. त्याचे प्रवर्तक स्वतः महायोगी भगवान आदिनाथ आहेत. म्हणून या महायोगाशी इतर कोणत्याही योगाबरोबर तुलना होऊ शकत नाही. या भूतलावर जितके योग प्रचलित आहेत त्या सर्व योगात भगवान शंकरांकडून प्रवर्तित झालेला महायोग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे.

महायोगा व्यतिरिक्त इतर जे अनेक योग आहेत. त्याने आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. इतर रिद्धी-सिद्धी प्राप्त होतात व साधकाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो व साधक आत्मसाक्षात्कारा पासून भ्रष्ट होतो. त्यामुळे इतर योगमार्गाने मनुष्यास ईश्वरी साक्षात्कार होत नाही. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे योगी चांगदेव महाराज. चांगदेवाने हठयोगाच्या माध्यमातून अनेक रिद्धी-सिद्धी प्राप्त केल्या होत्या. असे म्हणतात की, मेलेले मुडदे सुद्धा चांगदेवाच्या स्पर्शाने जिवंत व्हायचे तर अशा चांगदेवाला सुद्धा आत्मसाक्षात्कारा साठी ज्ञानेश्वरांना शरण जावं लागलं कारण ज्ञानेश्वर स्वतः महायोगाचे उपासक होते व हा महायोग त्यांना आदिगुरु शंकरा पासून प्राप्त झाला होता. इतर योगाची साधना करणारे योगी ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करून घेऊ शकत नाही. तर केवळ महायोगानेच सर्व जीव ईश्वरी साक्षात्कार व आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेऊ शकतात. याबाबत तिळमात्र शंका नाही. महायोग हा सिध्दमार्ग आहे. सिध्दमार्ग म्हणजे सिध्द असा मार्ग.  राजमार्गा सारखा तयार रस्ता. राजमार्गा वरून चालताना माणसाला कष्ट पडत नाही, त्रास होत नाही व तो मुक्कामाला नक्की सुखरूप पोहोचतो. एकदा राजमार्ग भेटल्या नंतर आडवे तिडवे फाटे फुटत नाहीत. मार्ग चुकण्याची भीती नाहीसी होते. या मार्गाने विनासायास योगाची प्राप्ती होते. योग प्राप्त झाला की शक्ती ची प्राप्ती होते, शक्तीतून भक्ती प्रगट होते, भक्ती मधून आत्म विस्तार होतो व मनुष्याचा उद्धार होतो.

हा महायोग ज्यावेळी गुरुकृपा होते त्यावेळी दृष्टीस पडतो. हा अतिशय गुह्य असा मार्ग आहे परंतु गुरुकृपा झाल्यावर अतिशय गुह्य असणारा हा मार्ग मात्र आपल्या दृष्टीपथास येतो. या मार्गाने साधक चालू लागला की तहान भूक विसरून जातो. त्याला रात्र व दिवस यांची आठवण राहत नाही. साधकाला रात्रंदिवस साधना करावी वाटते. एकदा का डोळे बंद केले की पुन्हा उघडण्याची इच्छा राहत नाही. गुळाला मुंगळा जसा चिकटतो तसाच साधक साधनेला चिकटून बसतो. त्याला त्यामध्ये एवढी गोडी निर्माण होते की इतर भौतिक सुख या आत्मसुखा पुढे त्याला तुच्छ वाटू लागतात.

सदगुरू असा सिद्ध योग साधकाला देतात. साधकाचे काम एवढेच की त्याने डोळे मिटून स्वस्थ बसायचे व प्राणायामाच्या माध्यमातून अक्षरब्रम्हाचा मनात जप करायचा बस्स! बाकी काही करायचे नाही जे काही होईल ते फक्त साक्षी होऊन पहायचे. साधक अशा प्रकारे पूर्ण शरण आला की सदगुरू कृपेने मुलाधारात निवास करणाऱ्या कुंडलीनी शक्तीचे संचलन सुरु होते. त्यामुळे हठयोग, मंत्रयोग, लययोग इत्यादी सर्व योग स्वाभाविक रीतीने आपोआप साधू लागतात. हे योग मुद्दाम स्वतंत्र रीतीने करण्याची गरज लागत नाही. आसन, मुद्रा, प्राणायाम, जप, अनुष्ठान, ध्यान-धारणा इत्यादी कोणतीही क्रिया स्वतःहून करण्याचे कारण उरत नाही. सर्व प्रकारच्या योगांचा व उपासनांचा अंतिम हेतू हा कुंडलीनी शक्ती जागृत करणे हा असतो. हा हेतू गुरूच्या कृपेने सहज साध्य होतो व तत्काळ कुंडलीनी जागृतीची अनुभूती येण्यास सुरुवात होते. महायोगाला सहज योग असेही म्हटले जाते. सहजयोग म्हणजे सहज होणारा योग. या योगात अवघड असे काही नाही. जे काही या महायोगात आहे. ते सर्व सोपे, साधे, सरळ व स्वाभाविक असे आहे. या महायोगात अस्वाभाविक असे काहीही नाही. मुद्दाम बलपूर्वक एकही गोष्ट या योगात करावी लागत नाही. महायोगामध्ये साधकाला कोणत्याही आपत्तीची शंका नसते.

शक्ती जागृत झाली की सर्व शरीर थरथर कापणे, उड्या मारणे, हसणे, रडणे, घाम येणे, रोमांच उभे राहणे, मन प्रसन्न होणे, आनंदित होणे, निरनिराळ्या तऱ्हेची आसने, बंध, मुद्रा, प्राणायम होणे इत्यादी क्रिया आपोआप होऊ लागतात व कुंडलीनी शक्ती जागृत होते आणि मनुष्य अखेर सिध्द होतो. त्याला अशक्य असं काही राहत नाही. जीवनामध्ये जर यशस्वी, शक्तिमान, एैश्वर्यवान व्हाव असं वाटत असेल तर महायोग विज्ञानाचे प्रयोग करा.

– प्रस्तुत लेख गुरुराज ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.

नाम

Blog placeholder

समस्त विश्वब्रम्हांडामध्ये ऊर्जा ओतप्रोत भरलेली आहे. ऊर्जा एकच आहे. आपल्याला मात्र ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व गतीमध्ये अभिव्यक्त होत असताना दिसत असते. यापैकी प्रत्येक ऊर्जेची दिशा व गती वेगवेगळी असते. विश्वब्रम्हांडामध्ये अनंत स्वरूपामध्ये भासत असणारी ही ऊर्जा ज्यावेळेला घनीभूत अवस्थेला प्राप्त होते त्यावेळी त्या वैश्विक ऊर्जेला जो आकार प्राप्त होतो तो आकार म्हणजेच ॐकार होय. म्हणून ॐ हेच वैश्विक उर्जेचे मूळ स्वरूप आहे.

जप करून, तप करून, योग करून, नमाज पढून, प्रेयर करून जगामधील समस्त धर्म, पंथ, संप्रदाय वैश्विक ऊर्जेचे म्हणजेच ईश्वराचे सत्य स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधुनिक विज्ञानाने बाह्य प्रकृतीच्या माध्यमातून हेच सत्य जाणण्यासाठी शेकडो सिद्धांत मांडले. हजारो प्रयोग केले. लाखो करोडो रुपयांचा चुराडा करून आधुनिक विज्ञान सुद्धा वैश्विक ऊर्जेचे मूळ स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना यश आले नाही. जगामधील समस्त धर्म, पंथ व संप्रदायांनी हेच सत्य जाणण्यासाठी वेगवेगळी कर्मकांड, उपासना पद्धती व योगिक प्रक्रिया निर्माण केल्या. परंतु त्यांना सुद्धा यश प्राप्त झाले नाही. एकीकडे विज्ञानाने मानवाला विनाशाच्या सर्वोच्च शिखरावर नेवून ठेवले आहे तर दुसरीकडे धर्म समाजामध्ये द्वेश निर्माण करून रोज मनुष्याचा नर संहार करत आहे. म्हणूनच कधी नव्हे तेवढी आज सत्य जाणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अणूचे विभाजन कोठेही करता येत नाही, अणुच्या विभाजनासाठी आपल्याला अणुसंशोधन केंद्रामध्येच (Atomic Research Center) जावे लागते. अणु संशोधन केंद्रामध्ये अणूला Reactor मध्ये टाकले जाते. अणूच्या केंद्रावर (nucleus) अल्फा किरणांचा मारा झाल्यानंतर अणूचे विभाजन होते व अणुमधून प्रचंड शक्ती बाहेर पडते. ज्याप्रमाणे अणूचे विभाजन अणुसंशोधन केंद्रामध्येच केले जाते व अणूचे विभाजन होण्यासाठी अल्फा किरणांचाच मारा करावा लागतो त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा वैश्विक ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी ध्यानकेंद्रा मध्येच जावे लागते व मूलाधार चक्रावर अक्षर ब्रम्हाचाच मारा करावा लागतो.

ध्यानकेंद्रामध्ये मूलाधारस्थित निद्रिस्त असलेल्या शक्तीवर ज्यावेळी अक्षर ब्रम्हाचा मारा होतो त्यावेळी निद्रिस्त असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते व प्रचंड अध्यात्मिक ऊर्जेचा आपणास अनुभव येतो. शरीरामधील एकेक चक्रे जागृत होतात, षडचक्राचे भेदन करून कुंडलिनी शक्ती शिवाशी एकरूप होते. ज्यावेळी शिव आणि शक्तीचे मिलन होते त्यावेळी देश, काल, वस्तू हा भेद मावळून जातो. मन उन्मन होत व या समस्त विश्व ब्रम्हांडामध्ये शुभ्र धवल वर्णाने, पांढुर वर्णाने विराजमान असणाऱ्या ऊर्जेची पांडुरंगाची अनुभूती येते. करोडो रुपये खर्च न करता कुठलीही साधना न करता केवळ नामाच्या सामर्थ्याने मनुष्य वैश्विक ऊर्जेची अनुभूती प्राप्त करू शकतो. परंतु नामाचा अनुभव समर्थ सदगुरूच्या समर्थ शक्तीपातानेच संभव आहे.

सदगुरू हे शक्ती संपन्न असतात, ते ज्यावेळी शिष्याला अनुग्रह देतात त्यावेळी ते शिष्याला नामाचा उपदेश करतात. शिष्य ज्यावेळी त्या नामाचा जप करतो त्यावेळी शक्तीपुंजीत झालेल्या शब्दाने शिष्याची आंतरिक ऊर्जा (कुंडलिनी शक्ती) जागृत होते. जोरजोरात श्वासोच्छ्वास होऊ लागतो, शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते, अंगाला दरदरून घाम येतो, शक्तीच्या प्रचंड आवेगाने शरीर ताडताड उडायला लागते. कठोर असणारे अंतःकरण मेणासारखे मऊ होते, डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला सुरुवात होते. संपूर्ण अष्टसात्विक भाव जागृत होतात. हीच नामाची सर्वश्रेष्ठ अनुभूती होय. सदगुरूंच्या कृपेने ज्या नामाने ही सर्वश्रेष्ठ अनुभूती प्राप्त होते ते नाम हेच खरे नाम होय.

||ॐ तत सत |ॐ तत सत |ॐ तत सत ||

– प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘ओंकार गाथा’ मधील ‘नाम’ या प्रकरणातून घेतला आहे.

मूळाधार चक्र

Blog placeholder

या समस्त सृष्टीचा जो मुळ आधार आहे तो मूल आधार म्हणजे मूळाधार चक्र होय. मूळाधार चक्राची देवता शनि आहे. या मूळाधार चक्रामध्ये आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, सुप्त अवस्थेमध्ये असतात. प्रत्येकाला मोठे होण्याची इच्छा असते. प्रत्येकाला कर्तृत्वाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होण्याची आकांक्षा असते. परंतु फक्त इच्छा व आकांक्षा असून कोणीही मोठा होत नाही. त्यासाठी शक्तीचीसुद्धा आवश्यकता असते. इच्छेला जर शक्तीची जोड भेटली तर या जगामध्ये अशक्य असे काही नाही. मनुष्याच्या समस्त इच्छा व आकांक्षा या मुळाधारामध्ये आहेत.

जप, तप, योग इत्यादींच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये असणारी कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतो. परंतु त्यासाठी किती काळ जाईल हे सांगता येत नाही. मग सर्वसामान्यांसाठी काही मार्ग नाही का? आहे, हा मार्ग आहे भक्तीचा, सेवेचा, समर्पणाचा. पुरुषार्थाचा अवलंब करून माणुस जेथे पोहोचतो, सेवा व समर्पणाने सुद्धा माणुस तेथेच पोहोचतो. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे.

जो श्रद्धावान असतो त्यालाच ज्ञानाचा व शक्तीचा लाभ होतो. तोच यशस्वी होतो. ज्यांच्यामध्ये पुरुषार्थ आहे अशा लोकांनी भौतिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कष्ट, मेहनत करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. परंतु जे दिन दुबळे आहेत ते जर मोठयांच्या आश्रयाखाली राहिले त्यांनी सेवा, समर्पण व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर मोठयांची मने जिंकून घेतली तर मोठी माणसे त्यांचा योगक्षेम वाहतात. जो मोठ्यांना शरण जातो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या प्रति समर्पित होतो अशांना मोठी माणसं, यशस्वी माणसं, कर्तृत्वान माणसं, ऐश्वर्यवान व्यक्ती त्यांना जीवनांमध्ये काही ही कमी पडू देत नाहीत. कारण मोठ्यांना सुद्धा आपला कारभार सांभाळण्यासाठी दैवी गुण असणार्‍या व्यक्तीची गरज असते.

परमार्थामध्ये सुद्धा असेच आहे. ज्यांच्यामध्ये पुरुषार्थ आहे ते लोक जप तप व योगाच्या माध्यामातून आपला भौतिक व अध्यात्मिक विकास साधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु जे दीन, दुबळे, पतीत आहेत त्यांचा मार्ग आहे भक्तीचा, सेवेचा, समर्पणाचा. शनिदेव सर्वशक्तिमान आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, जागृत आहे. कलीयुगामध्ये बर्‍याच देवता ह्या निद्रीत स्वरुपात पहुडलेल्या आहेत. त्यांना जर जागृत करायचं असेल तर बारा बारा वर्ष तपश्चर्या करावी लागते. लाखो कोटी मंत्रांचा जप करावा लागतो, तेव्हा कुठे मंत्र सामर्थ्याने ह्या देवता जागृत होतात व आपल्या भक्तांना त्यांच्या तपश्चर्येचे फळ देतात. परंतु शनिदेव हे मुळातच जागृत आहेत. कलीयुगामध्ये अखंड जागृत असणारा एकमेव देव म्हणजे शनिदेव.

जागृत आहे म्हणून प्रत्येक राशीमध्ये भ्रमण करत आहे. जागृत नसता तर भ्रमण केले असते का? म्हणून शनिदेवाला तपश्चर्या करून अथवा मंत्रशक्तीच्या माध्यमातून जागृत करण्याची आवश्यकता नाही. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आवश्यकता आहे सेवेची, समर्पणाची आणि प्रेमाची. शनिदेवाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की शनिदेवाला लहानपणीच सर्वांनी झिडकारले होते. त्यामुळे शनिदेव हे आत्मकेंद्रित असतात. भगवान शंकराकडून प्राप्त झालेल्या अनाहत नादामध्ये अखंड रमलेले असतात. भगवान शंकराने दिलेल्या दिव्य बोधावर सोsहं बोधावर स्थिर असतात.परंतु कुठेतरी मनाच्या कोपर्‍यामध्ये आपुलकी, प्रेम, यासाठी आसुसलेले असतात.

ईश्वर हा प्रेमाचा भुकेला आहे. त्याला आणखी काही नको. एखादा महाज्ञानी, महायोगी जो सोsहं भावामध्ये आकंठ बुडालेला आहे परंतु भक्तीच्या सुखासाठी तो ज्यावेळी शनिदेवाच्या भक्तीला लागतो, त्यांची नित्य उपासना, सेवा करतो त्यावेळी ते समस्त ऐश्वर्याने त्याच्यासमोर प्रकट होतात. असा जो महायोगी असतो तो आपल्या भक्तीच्या व योगाच्या अलौकिक सामर्थ्याने जसा पुंडलीकाने प्रत्यक्ष परमात्म्याला विटेवर उभा केला आहे तसा तो परमात्म्याला आपल्या अलौकिक अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर उभा करतो.

इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. असाच नवीन इतिहास शनैश्वर संस्थान, डोंबिवली येथे घडला आहे. एका महायोग्याने आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावर जसा पुंडलीकाने पांडुरंगाला विटेवर उभा केला आहे तसाच शनैश्वर संस्थान, डोंबिवली येथे शनी देव उभा आहे. येथील शनिदेवाची शिळा ही शिळा नसून ते शक्तीकुंड आहे. ह्या शक्तीकुंडामधून उर्जा अहोरात्र प्रवाहित होत असते. तुम्ही या शक्तीपीठामध्ये असलेल्या शक्तीकुंडाची, भगवान शनीच्या शिळेची नित्य उपासना, पूजा, सेवा केली तर शक्तीकुंडामधून शिळेमधून प्रवाहित होणार्‍या शक्तीने, उर्जेने तुमचे मूळाधार चक्र जागृत होऊन थोड्याच काळामध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास सुरुवात होते. जसजशी तुमची साधना वाढेल तसतशी तुमची भौतिक व अध्यात्मिक अशी दोन्ही प्रगती लोकांच्या नजरेत येण्यास सुरुवात होते. म्हणून कुठलाही योग न करता फक्त सेवा व समर्पण या माध्यमातून तुम्ही शनिच्या शीळेची, शक्तीकुंडाची उपासना करून योग साधु शकता.

मुलाधाराची देवता शनि आहे व मुलाधारामध्येच आपल्या इच्छा आकांक्षा सुप्त स्वरुपात आहेत. शनिदेवाच्या स्वयंभु जागृत शिळेच्या शक्तीकुंडाच्या उपासनेने आपल्या इच्छा व आकांक्षाना गती भेटते व संसारामध्ये राहुन माणुस भौतिक व अध्यात्मिक असा दोन्ही विकास साधु शकतो. परमार्थ करणार्‍या बर्‍याच लोकांना हे रहस्य माहित नाही. त्यामुळे हे पारमार्थिक लोक कनिष्ठ देवता म्हणुन शनिदेवाला हिणवतात, तुच्छ समजतात. शनीची उपासना म्हणजे सामान्य ग्रहाची उपासना समजतात. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगायला लागतात.

वास्तविक शनीची उपासना ही सामान्य ग्रहाची उपासना नसून ती मूलाधार चक्राची उपासना आहे. अध्यात्मा मध्ये या मूलाधार चक्राला फार महत्व आहे. मूलाधार चक्राच्या जागृतीनेच मनुष्याच्या अध्यात्मिक जीवनाला सुरुवात होत असते व मूलाधार चक्राच्या जागृतीनेच मनुष्याच्या भौतिक विकासाला सुरुवात होत असते कारण मनुष्याच्या सुप्त असणाऱ्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती फक्त मूलाधार चक्रामध्येच आहे. ज्यांचा ज्यांचा भौतिक व अध्यात्मिक विकास झाला आहे त्यांचा तो विकास मूलाधार चक्राच्या जागृतीनेच झाला आहे. हे रहस्य आपणास माहित असो वा नसो, पण सत्य हेच आहे. जाणता अथवा अजाणता भौतिक वा अध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी असणाऱ्या व्यक्तींनी मूलाधार चक्राचीच उपासना केलेली असते.

हे मूलाधार चक्र श्रद्धा, सेवा, समर्पण या माध्यमातूनच विकसित होत असते. तुम्ही कोणावर श्रद्धा ठेवली आहे याला महत्व नाही, तुमची श्रद्धा किती दृढ आहे याला जास्त महत्व आहे. तुम्ही कोणाची सेवा केली याला महत्व नाही, तुम्ही किती निस्वार्थ भावनेने सेवा केली आहे याला महत्व आहे. तुमचे समर्पण कोणाशी निगडीत आहे याला महत्व नाही, तुमचे समर्पण संपूर्ण भावाने आहे की नाही याला महत्व आहे. भौतिक व अध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी झालेल्या मनुष्याची कोणावर ना कोणावर श्रद्धा असते मग ती श्रद्धा व्यक्तीनिष्ठ असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीशी निगडीत असेल अथवा आत्मनिष्ठ म्हणजे स्वतःशीच निगडीत असेल. ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास नाही तो मनुष्य या जगामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून व्यक्तीनिष्ठ श्रद्धे बरोबर आत्मनिष्ठ श्रद्धा सुद्धा तेव्हढीच महत्वाची आहे.

पुरुषार्थाला परमार्थाची जोड पाहिजे व परमार्थाला पुरुषार्थाची जोड पाहिजे. तरच भौतिक व अध्यात्मिक अशी दोन्ही प्रगती साधून माणूस जिवंतपणीच आपले घर स्वर्ग बनवू शकतो. हेच आमचे शनी विज्ञान आहे. हे शनिविज्ञान आत्मसात करा, त्याचे प्रयोग करा. फक्त देव-देव करत बसू नका. कष्ट करा, मेहनत करा, पुरुषार्थ करा. शनिदेवाची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आपल्या पुरुषार्थाने सर्व काही मिळविले आहे, त्यांनी मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो या समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेने दीन, दुबळे, पतित यांची सेवा करावी. म्हणजे शनिदेवाची त्यांच्यावर अवकृपा होणार नाही. थोडक्यात शनिदेवाची अवकृपा टाळून शनिदेवाची कृपा संपादन करण्याचे जे ज्ञान आहे तेच हे शनिविज्ञान.

 – प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘शनी विज्ञान’ या पुस्तका मधून घेतला आहे

कुंडलिनी शक्ती

Blog placeholder

कुंडलिनी शक्ती

शास्त्रज्ञांच्या मते हे विश्व म्हणजे शक्तीक्षेत्र आहे. विश्व अंतर्बाह्य स्फुरण पावणारे गतिमान व परिवर्तनशील आहे. विश्वाच्या प्रत्येक पदार्थात अणूंच्या इलेक्ट्रॉनचे भ्रमण स्पंदन सुरु आहे. ग्रह उपग्रह ताऱ्यांचे भ्रमण सुरु आहे. आपल्या आकाशगंगे सारख्या लक्षावधी आकाशगंगा आपल्या ब्रम्हांडामध्ये आहेत व एकेका आकाशगंगेत लक्षावधी ग्रह तारे आहेत. अणूच्या गर्भापासून ते थेट आकाशगंगेपर्यंत हे विश्व भ्रमणशील आहे चैतन्यमय आहे.

आकाशगंगेतही नवीन तारे जन्मास येत असतात. काही नष्ट होत असतात. काही आकुंचन पावत असतात. काही प्रसरण पावत असतात. काही उष्ण होत असतात. काही थंड होत असतात. सर्व आकाशगंगा एकमेकांपासून अजस्त्र वेगाने दूर जात आहेत. शास्त्रज्ञांच्या मते काही काळानंतर त्यांचे दूर जाणे थांबेल व त्या उलट दिशेने प्रवास करतील त्यांच्या मध्ये आण्विक स्फोट होतील व संपूर्ण विश्वाचा संहार होईल. नंतर परत विश्वाची उभारणी सुरु होईल. ज्या शक्तीच्या सहाय्याने विश्वाची निर्मिती होते त्याच शक्तीच्या माध्यमातून विश्वाचा संहार होतो.

विश्वनिर्मिती म्हणजे क्रमविकास व विश्वसंहार म्हणजे क्रमसंकोचन. अशा प्रकारे क्रमविकास व क्रमसंकोचन अनंतकाळापासून सुरु आहे. क्रमविकास अवस्था सुरु झाल्यावर ब्रम्हांडाची निर्मिती होते. ब्रम्हांडाची रचना केल्यावर जी शक्ति शिल्लक राहते ती अणुस्वरूप धारण करण्याकरिता चक्राकार फिरू लागते. तिच्या चक्राकार स्वरुपामुळेच तिला कुंडलाकार प्राप्त होतो. हीच विश्वनिर्मिती भगवती कुंडलिनी शक्ती होय.

कुंडलिनीचे स्वरूप

कुंडलिनी म्हणजे चितशक्ती पराशक्ती शब्दब्रम्हाची स्फूर्ती होय. योगवसिष्ठ ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणाच्या पूर्वार्धातील ८० व्या सर्गात कुंडलिनी शक्तीचे स्वरूप विवेचन करताना वसिष्ठ म्हणतात शरीरात सुषुन्मा म्हणून एक नाडी आहे ती सभोवार पसरलेल्या तंतूंनी वेष्टित असल्यामुळे परिमंडलातिकार आहे. तिच्यापासून शंभर नाड्या निघाल्या आहेत. कुंडलाच्या आवर्ताखाली तिची रचना आहे. थंडीने व्याकूळ होऊन पडलेल्या मोठ्या सर्पाच्या वेटोळ्याप्रमाणे तिने मंडल केले आहे.

ती शुभ्र आहे. प्राणवायूच्या योगाने एकसारखी स्पंदन पावणारी अशी ती सुषुन्मा नाडी आहे. तिच्या मुळाशी आत कुंडलाच्या आकाराची कुंडलिनी या नावाची चितशक्ती आहे. विणेमधून जशी तार झंकारते त्याप्रमाणे मुळाधारातून अत्यंत सूक्ष्म असा नाद तिच्यातून अनहत ध्वनीच्या रूपाने झंकारत असतो. केळीच्या गाभ्याप्रमाणे कोमल असलेल्या त्या मुलाधारातील ती पराशक्ती कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध आहे. कारण ती कुंडलाकार धारण करून आहे ती प्राण इंद्रिये मन बुद्धी इत्यादी सर्वांच्या शक्तींना स्फूर्ती देणारी आहे.

अतिशय रागावलेल्या नागिनीप्रमाणे ती एकसारखी आपल्या तोंडाने प्राणाला वर फेकते व अपानाला खाली ओढते. याप्रमाणे ती सदा श्वासोच्छवास प्रक्रियेत निःश्वासरूप होऊन राहिली आहे. कुंडलिनी शक्ती सर्व वृत्तीचे बीज असल्यामुळे प्राणामध्ये क्रियाशक्ती व बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती उत्पन्न करते. महासागरात जशा नदया विलय पावतात. त्याप्रमाणे तिच्यामध्ये सर्व नाड्या विलय पावतात. प्राणशक्तीस्वरूप मुलाधारस्य कुंडलीनी पासून प्रणवादी सर्व मंत्रांची उत्पत्ती होते. गायत्री मंत्राची उत्पत्ती कुंडलीनी पासून होते हे सांगताना योगचुडामणी उपनिषदांत असे म्हटले आहे की कुंडलिनी शक्ती हि प्राणशक्तीयुक्त अशा गायत्रीचे उत्पत्तीस्थान आहे. प्राण विद्यारुपाने ज्या गायत्रीची उपासना केली जाते ती खरोखर कुंडलिनीच्या रूपाने साकार झालेली महाविद्याच होय. जो या महाविद्येला जाणतो तोच खरा वेदविद्येचे रहस्य जाणतो.

सर्पाला जशी दोन तोंडे असतात त्याप्रमाणे कुंडलिनीला अंतर्मुख व बहिर्मुख अशी दोन मुखे असतात. ती एका मुखाने ब्रम्हव्दार अडवून निद्रा घेते व दुसऱ्या मुखाने ती श्वास-प्रश्वास करते. हाच जीवाचा श्वासोच्छ्वास होय. एका मुखाने ही शक्ती नेहमी जागृत असते. या जागृतीमुळेच जीवाला बाह्य ज्ञान किंवा चेतना चांगल्या रीतीने होते. कुंडलिनीच्या या बहिर्मुख गतीमुळेच जीवाला एकत्वाची जाणीव न होता भिन्नतेची जाणीव होते. कुंडलिनी शक्तीचे अंतर्मुख हे सुप्त किंवा बंद असल्यामुळे जीवाला आपण कोण आहोत हे कळत नाही. त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा कायम अभाव असतो.

अद्वयतापोनिषदात कुंडलिनीचे वर्णन करताना ऋषींनी म्हटले आहे कि देहामध्ये सूर्यासारखी तेजस्वी रूप असलेली व पोर्णीमेच्या चंद्राप्रमाणे शितल असलेली सुषुन्मा नावाची नाडी आहे तिचा आरंभ मुलाधारापासून होऊन ती ब्रम्हरंध्रापर्यंत जाते. या नाडीमध्ये कोटीकोटी विजेप्रमाणे तेजस्वी व कमळाच्या तंतूप्रमाणे सूक्ष्म असलेली कुंडलिनी नावाची प्रसिद्ध शक्ती वास करते.

महानारायण उपनिषदांमध्ये कुंडलिनीचे फार सुंदर वर्णन आले आहे ही कुंडलिनी शक्ती दोन ढगांमध्ये प्रकट होणाऱ्या विद्यूतलतेप्रमाणे तेजस्वी आहे. विजेपेक्षाही चपळ व अत्यंत बलवान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनी शक्तीचे जे अपूर्व वर्णन केले आहे. ते कुंडलिनीचे स्वरूप समजून घेण्यास अतिशय उपयुक्त असे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-

नागिणीचे पिले| कुंकुमे नाहले| वळण घेऊन आले| शेजे जैसे ||

कुंकवाने किंवा केशराने न्हालेले नागिणीचे पिल्लू वेटोळे घालून निजलेले असावे त्याप्रमाणे मुळाधारात ती लहानशी सर्पासारखी कुंडलिनी शक्ती साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून निजलेली असते. ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे नाभीस्कंदात नीट घट्ट व संकोचून बसलेली असते. ती कुंडलिनी जगदंबा आहे. जगाची माता आहे. सार्वभौम चैतन्याची ती ऐश्वर्यरूप शोभा आहे. ती जगद बीजाचा अंकुर जो जीव त्याच्यावर सावली धरते. ती निराकार ब्रह्माची साकार मूर्ती परमात्मा शिवाची संबळी व ओंकाराची जन्मभूमी आहे.

कुंडलिनी शक्ती जेव्हा हृदयापाशी येते. तेव्हा ती आपल्या तेजाची शिदोरी चैतन्याला अर्पण करते म्हणजे ती हृदयस्थ प्राणरूप आत्म्याशी आपल्या तेजासकट एकरूप होते. अर्थात कुंडलिनी आपली तेजरूप कांती टाकून जेव्हा प्राणरूप धारण करते त्यावेळी तिचे स्वरूप पुढील प्रमाणे दिसते. एखाद्या वाळूच्या बाहुलीला सोन्याचा पितांबर पांघरावा व तो सोडून मग तिला वेगळे करून ठेवावे त्याप्रमाणे ती दिसते. वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत विझावी किंवा वीज चमकून एकदम आकाशात नाहीशी व्हावी त्याप्रमाणे हृदय कमळापर्यंत जाऊन ती सोन्याच्या सरीसारखी किंवा प्रकाशाचा तेजोमय झरा वाहत असल्याप्रमाणे दिसते. तो शरीररूप तेजाचा झरा हृदयरुपी भूमीच्या पोकळीत एकदम जिरतो व शक्तीचे रूप शक्तीतच विरते. शिवाशी एकरूप झाल्याने ती फक्त प्राणरूपाने जाणली जाते. साऱ्या भौतिकाचा आधार असणारी ही शक्ती अनिर्वचनीय आहे. हीच तिची खरी ओळख आहे. हेच हिचं खर स्वरूप आहे.

कुंडलिनी जागृतीची आवश्यकता

वास्तविक शक्ती एकच आहे. ‘एकोSहं बहुस्यामि’ मी एक आहे मी बहु व्हावं या स्फूर्तीने ती सृष्टीच्या विविध कोटीत रुपांतरीत होते. आधुनिक विज्ञान म्हणत आहे कि उष्णता, विद्युत, चुंबक, गुरुत्वाकर्षण, आकर्षण, अपसारण ह्या एकाच शक्तीची विविधरूपे आहेत. शास्त्रज्ञांनी उर्जा अविनाशाचा सिद्धांत मांडून ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ते म्हणतात उर्जा निर्माण करता येत नाही तसेच तिचा नाशसुद्धा करता येत नाही. फक्त उर्जेचं रुपांतर करता येत. जे आपल्या इंद्रियांना प्रत्यक्ष जाणवतं ते जडद्रव्य वस्तूतः ते जडद्रव्य नाही तर त्याचे स्वरूप उर्जेचे आहे.

या संदर्भात ‘मॅक्स फ़ॅक्स’ या शास्त्रज्ञाची (Quantum Theory) क्रांतिकारक मानली जाते. जडवस्तू (Matter) व उर्जा (Energy) यांचे परस्परांत परिवर्तन होऊ शकते. यापैकी जडवस्तू हे उर्जेचे स्थूल स्वरूप आहे. उर्जा ही अत्यंत सूक्ष्म व अनिर्वचनीय आहे. रेडीओ लहरी, दूरदर्शन लहरी व प्रकाशलहरी यांत मुलतःच कोणताही भेद नाही. या सर्व लहरींना Electro Magnetic Radiation असे सामुदायीक नाव आहे. अशाप्रकारे ती एकच शक्ती सृष्टीच्या विविध कोटीत कशी रुपांतरीत होते हे आपण पाहिलं.

ही शक्ती अमर्याद अनंत असल्यामुळे सृष्टीचा पूर्ण पसारा उभारूनही शेष म्हणजे शिल्लक राहते. ही शेष राहिलेली शक्ती म्हणजे मुलाधारातील कुंडलिनी शक्ती होय. ही जेव्हा उर्ध्वभिमुख होते तेव्हा उत्क्रांतीला सुरुवात होते. उत्क्रांती शिखरावरील मानवदेह हे आत्मसाक्षात्काराचे उत्कृष्ट साधन आहे. आत्मा नित्य शुद्ध मुक्त असल्यामुळे तो मूलतःच पूर्ण आहे. सूर्यामुळे उत्पन्न होणारे ढग ज्याप्रमाणे सूर्यालाच झाकतात व काही काळ आपल्याला सूर्यदर्शन होत नाही. त्याप्रमाणे शुद्ध चैत्यन्यरूप असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी ‘अहं’ ही स्फूर्ती होते व या स्फुर्तीज्ञानामुळे मनुष्य स्वतःला देह समजतो व काही काळ आपल्याला आत्मदर्शन होत नाही. परंतु ज्याप्रमाणे सोसाट्याचा वारा यावा आणि सर्व ढग उडून जावे त्याप्रमाणे सदगुरु कृपारूपी वारा वाहू लागला कि अज्ञानाचे ढग नाहीसे होतात व स्वयंप्रकाशरुपी आत्मा स्वतेजाने तळपू लागतो. त्यावेळेला मी देह म्हणजे जड आहे ही भावना नाहीसी होऊन मी ब्रम्ह म्हणजे चैतन्य आहे ही अनुभूती येते. ही अनुभूती प्राप्त होण्यासाठी कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची आवश्यकता असते. कारण कुंडलिनी म्हणजे चैतन्यशक्ती.

ही शक्ती मूलाधारात वास करते. तिच्या अस्तित्वामुळेच सृष्टीचा आधार मूलाधार आहे. या आधाराच्या ठिकाणीच सर्व देवता वास करतात. या आधाराच्या पश्चिम भागात इडा पिंगळा व सुषुन्ना यांचा संगम होतो. ज्यावेळी गुरुकृपेने शक्ती जागृत होते. त्यावेळी मन व प्राण यांचा संयोग होऊन साधकाला दिव्य स्नान घडते. तेव्हा केवळ तेव्हाच तो साधक सर्व पापांतून मुक्त होतो. एरव्ही कुंभ मेळ्यात कितीही डुबक्या मारल्या तरी त्याला काही अर्थ नाही. ते फक्त भौतिक स्नान आहे. मन धुवायचं असेल तर इडा पिंगळा व सुषुन्नेच्या संगमातच स्नान घडलं पाहिजे आणि हे स्नान सदगुरुकृपेने कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर उपभोगाला भेटत. एरव्ही हे कदापीही शक्य नाही. मुलाधाराच्या पश्चिम भागामध्ये स्वयंभू लिंग असून तेथेच सुषुन्नेचा प्रवेशद्वार म्हणजे ब्रम्हद्वार आहे. हा मार्ग जेव्हा मोकळा होतो तेव्हा साधक सर्व प्रकारच्या संसार बंधनातून मोकळा होतो.

आपण मागे पाहिलेच आहे कि कुंडलिनी शक्ती ही द्विमुख शक्ती आहे. म्हणजेच कुंडलिनी शक्तीला दोन मुखे आहेत. ती एका मुखाने ब्रम्हद्वार अडवून निद्रा करते व दुसऱ्या मुखाने जागृत असते. त्यामुळेच जीवाला बह्यज्ञान किंवा चेतना प्राप्त होते परंतु फक्त चेतनेने चैतन्याची अनुभूती कशी येणार. चैतन्याची अनुभूती येण्यासाठी ही निद्रिस्त शक्ती जागृत होणे आवश्यक आहे. चितशक्ती ज्यावेळेला जागृत होते त्यावेळी शरीरातील प्रत्येक कणातून रक्तवाहिन्यातून चैतन्याचा प्रवाह प्रवाहित होतो. त्यामुळे शक्तीचे कार्य सुरु होऊन शरीराची जडता कमी होते व ही शक्ती क्रमाक्रमाने मनुष्याचे चैतन्यरूप प्रकट करते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर त्याच्या देहाची जशी स्थिती असेल व मनाची जशी धारणा असेल त्याप्रमाणे शक्ती जागृत होऊन विकास होतो. अज्ञान जावून ज्ञान प्रकट होऊ लागते. कुंडलिनीच्या जागृतीमुळे हा विकास व ज्ञानप्राप्ती आपोआप घडून येते व शेवटी मनुष्याचा उद्धार होतो. ‘उत’ म्हणजे वरच्या दिशेने व ‘धार’ म्हणजे चैतन्याचा प्रवाह. कुंडलिनी ही चैतन्यमयी असल्यामुळे ती जागृत झाल्यावर ऊर्ध्वमुखाने म्हणजे वरच्या दिशेने चैतन्याचा प्रवाह प्रवाहित होऊन शेवटी संपूर्ण चैतन्याची प्रचीती येते. ही प्रचीती येण्यासाठी कुंडलिनी जागृती अत्यंत आवश्यकता आहे. किंबहुना कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय ही अनुभूती येणे कदापीही शक्य नाही. सात्विकभाव जागृत होतात.

ही शक्ती दैवी ज्ञानाने युक्त असल्यामुळे प्रज्ञा जागृती, प्रतिभाशक्ती, कवित्व, ग्रंथनिर्मिती, असामान्य वक्तृत्व, नेतृत्व, शास्त्रामधील गूढ सिद्धांताची फोड, अतींद्रिय शक्ती जागृती, नवनवीन सिद्धांताची निर्मिती, प्रचंड आत्मविश्वास निडरपणा, कालबाह्य झालेल्या रुढी नियम तोडून सामाजिक विकासासाठी नवीन मूल्यांच्या निर्मिती इत्यादी गोष्टी आपोआप घडू लागतात. सरतेशेवटी मायेच्या यच्चयावत् बंधाचा पूर्ण निरास होऊन आत्मा स्वतेजाच्या प्रकाशाने चमकू लागतो. व्यक्ती स्वतःच शिवरूप होऊन जागृत कुंडली बनून ज्याप्रमाणे एका दिव्याने अनेक दिवे पेटवावे त्याप्रमाणे तो लोकांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करून लक्ष लक्ष ज्ञानदीप प्रज्वलित करतो.

शंका व समाधान

वरील सर्व विवेचन वाचल्यानंतर कदाचित कुणी अशी शंका घेईल की आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती जर अस्तित्वात आहे तर आतापर्यंत एकाही शरीरशास्त्रज्ञाला ती कशी दिसली नाही. आज विज्ञान एवढ प्रचंड प्रगत झालं आहे. कितीतरी प्रकारच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा फोटोग्राफी व एक्स-रे मशिन्स निघाल्या आहेत. मग तरी सुद्धा अजूनपर्यंत ह्या कुंडलिनीच दर्शन एकाही शरीर शास्त्रज्ञाला कसं झालं नाही. ज्या गोष्टी आधुनिक प्रगत विज्ञानाला माहित नाही त्या गोष्टी प्राचीन ऋषीमुनींनी कशा जाणल्या. खरोखर हे सत्य आहे कि थोतांड? कुंडलिनी शक्ती ही कपोलकल्पित गोष्ट तर नाही ना?

आपल्या सर्व शंका रास्त आहेत. बरोबर आहेत. आधुनिक विज्ञान प्रगत जरूर झालं आहे परंतु विज्ञानाला सुद्धा काही मर्यादा आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विज्ञान दृश्यावर प्रयोग करत आहे. विविध प्रयोगशाळा, विशिष्ट उपकरणे, अत्याधुनिक यंत्रे हि विज्ञानाची साधने आहेत. वैज्ञानिक ज्ञान हे सापेक्ष आहे. कारण ते शरीर मन बुद्धीच्या कक्षेत आकलन करता येत. अध्यात्मिक ज्ञान मात्र आपली इंद्रिये मन बुद्धी यांच्या कक्षेत आकलन करता येत नाही. ‘यतो वाच्यो निर्वतन्ते अप्राप्य मनसा सह:’ येथे वाचा खुंटीत होते. मन उन्मन होऊन बुद्धीची मर्यादा संपते.

अध्यात्म ज्ञान हे निरपेक्ष आहे. त्यामुळे ते विज्ञानाच्या कक्षेत येत नाही. आधुनिक विज्ञानाने हि गोष्ट मान्य केली आहे. भौतिक शास्त्रज्ञ भौतिक वस्तूचे पृथक्करण करून मानवी सुखात भर टाकत होते. तोपर्यंत सर्वकाही ठिक चाललं होत. परंतु ज्यावेळी ते प्राण, मन, बुद्धी, आत्मा ह्या चैत्यन्यशक्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले त्यावेळी त्यांची सृष्टी संशोधनाची आधुनिक साधने तेथे तोकडी पडू लागली आणि मग विज्ञानशास्त्रातले प्रकांड पंडित आईनस्टाईन, मिलीकन, एडिसन म्हणू लागले की आधुनिक विज्ञानाची सृष्टी संशोधनाची पद्धती तिच्या पलीकडे असणाऱ्या अदृश्य शक्तीला (Spiritual world) लागणे शक्य नाही. एन. वासुदेवन या विचारवंतानेही अणुमधील अधिष्टात्री देवता ही शास्त्रीय ज्ञानाच्या पलीकडे आहे अस म्हटलं आहे. पहा Modern Science & Self knowledge – Mountain Path July 1984. विज्ञानाच्या पलीकडे काही क्षेत्रे आहेत हे शास्त्रज्ञ नम्रपणे कबुल करू लागले आहेत. परंतु विज्ञानच न समजलेले काही शहाणे मात्र अध्यात्म व अध्यात्मिक साधना यांना मेंदूवर झालेला परिणाम संमोहन वगैरे नाव देवून खोट्या ठरवू पाहत असतात. असो, तांदळामध्ये नाही का खडे असतात. जग हे असेच आहे व ते असेच राहणार. आपण मात्र आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

प्रख्यात वैज्ञानिक एडिसन म्हणतो की कोणतीतरी अज्ञात अव्यक्त शक्ती कारणरूपाने कार्य करत आहे. आम्ही त्या तत्वाबद्दल त्या शक्तीबद्दल काही जाणत नाही. भौतिक जगाच्या पलीकडे काही अज्ञात अव्यक्त तत्वाशी सामना करावा लागतो हेही सत्य शास्त्रज्ञांनी आता कबुल केलं आहे. आपल्या सर्वांना मन आहे. अहो मन आहे म्हणून कॉलेजमध्ये आपण मानसशास्त्र शिकतो ना! आपल्याला फक्त मन आहे एवढंच नाही तर या मनाला काही रोग सुद्धा आहेत असं आपण मानतो म्हणून mental hospitals सुद्धा आहेत. परंतु मन कोठे आहे? मेंदू डोक्यात असल्यामुळे व त्याची शंभर टक्के खात्री असल्यामुळे मन मेंदूतच आहे. असा चुकीचा गैर समज आपला झाला आहे.

भौतिक शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कार्याचे वर्णन केले असले तरी अमुक एक भाग म्हणजे मन असा उल्लेख कोठेही केला नाही. तसेच मेंदूलाच कोणी मन म्हणत नाही. मेंदू हा जड तत्वांचा बनला असल्यामुळे त्याला चैतन्याचे गुण नाहीत. Mental Hospital असले तरी कुणी मनावर शस्त्रक्रिया केल्याचे अगर मनाला इंजेक्शन मारल्याचे ऐकिवात नाही. कारण मन अदृश्य आहे. म्हणजे विज्ञानाच्या मर्यादित साधनांनी व उपकरणांनी त्याच अस्तित्व सिद्ध करता येत नाही. प्रत्येक क्षणाला ज्याच अस्तित्व आपण मान्य करतो ते मन जर विज्ञानाला दाखवता येत नाही तर मनाला चेतना देणारी शक्ती भगवती कुंडलिनी शक्ती ती विज्ञानाच्या मर्यादित उपकरणांनी कशी बरे दाखवता येईल. कुंडलिनी शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव न घेता तिच्या विषयी बोलणारे धर्माचार्य व विज्ञानवादी या दोघांमध्ये काहीही फरक नाही. कुंडलिनी शक्तीचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे ते छातीठोकपणे सांगतात कुंडलिनी शक्ती, चैतन्यशक्ती ही आपल्या आत मध्ये विराजमान आहे. तिला जागृत करून मनुष्य चैतन्यरूप होऊ शकतो.

भारतीय संस्कृती व भारतीय तत्वज्ञानाची ओळख ज्यांनी संपूर्ण जगाला दिली ते विश्वविजेते स्वामी विवेकानंद राजयोग ग्रंथाच्या चौथ्या प्रकरणात असे म्हणतात की संपूर्ण ज्ञान व संपूर्ण चैतन्य यांची प्राप्ती करून घेण्याकरिता कुंडलिनी जागृत करणे हा एकच उपाय उपलब्ध आहे. सर्व सुखाची जननी प्राणशक्ती कुंडलिनी तुमच्या जवळच आहे. तिची आराधना करा तिला आळवा तिचे दुध तुम्हांस मिळाले तर अनंत काळापासून तुम्हांस लागलेली क्षुधा व तृष्णा तत्क्षणीच शांत होईल. विज्ञान या बद्दल अज्ञान आहे. व आपल अज्ञान विज्ञानाने कबूल केलं आहे. भावी काळात ही आनंदाची गोष्ट आहे. चला आपण विज्ञानातून अध्यात्माकडे वाटचाल करूया.

– प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.